Skip to main content

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा   

प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे
पुणे रिसर्च टाईम्स

भारत-चीन या ४०५६ किमी लांब सीमेवर एकूण ४ महत्वाचे 'ट्राय-जंक्शन्स' आहेत. 

'ट्राय-जंक्शन' म्हणजे काय, तर एक असा छोटासा भूभाग जिथे तीन देशांच्या सीमा येऊन मिळतात. हा भूभाग लष्करीदृष्ट्या अतिसंवेदनशील असतो. 

ही 'ट्राय-जंक्शन्स' हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत. जी अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की जो देश या चारही ट्राय-जंक्शन्स वर ताबा मिळवेल, तोच या खडतर हिमालयीन युद्धक्षेत्रात वरचढ ठरेल. कारण त्यांची भौगोलिक स्थिती सैन्याला जबरदस्त लेव्हरेज प्रदान करते. ही ट्राय-जंक्शन्स खालीलप्रमाणे आहेत- 

१. सियाचीन ग्लेशियर 
२. कालापानी / लिपुलेख पास 
३. डोकलाम 
४. दिफु पास

सुदैवाने या ४ पैकी ४ ही ट्राय-जंक्शन्स भारताच्याच अधिपत्याखाली आहेत. साहजिकच चीनी ड्रॅगनची वक्रदृष्टी यांवर आहे. म्हणून या सर्व ट्राय-जंक्शन्सचे सामरिक महत्व जाणून घेणे आवश्यक ठरते. 

१. सियाचीन ग्लेशियर- 🇮🇳🇵🇰🇨🇳

भारत-पाकिस्तान-चीन यांच्या सीमा या फक्त  
७६ चौ.किमी क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. लदाखच्या काराकोरम रेंज मध्ये २०,००० फूट उंचीवर सियाचीन स्थित आहे. सियाचीन हे जगातले 'सर्वांत उंच युद्धक्षेत्र' आहे, ज्याला पृथ्वीचा तिसरा ध्रुव सुद्धा म्हणतात. -६०℃ चे तापमान आणि हिमस्खलनांमुळे सियाचीन हे सर्वांत कठीण युद्धक्षेत्र आहे. १९८४ साली 'ऑपरेशन मेघदूत' द्वारे भारतीय सेनेने सियाचीन ताब्यात घेतले. याचाच बदला म्हणून पाकिस्तानने १९९९ ला कारगिल युद्ध भारतावर लादले होते, पण शेवटी भारताचीच सरशी झाली.

सियाचिनचे भारतासाठी सामरिक महत्व- 

🔸 सियाचिनमुळे पाकव्याप्त काश्मीर आणि चीनव्याप्त अक्साई चीन यांच्यात संपर्क प्रस्थापित होत नाही. भारत एकाच वेळी POK आणि अक्साई चीन वर लक्ष ठेऊ शकतो. 

🔸 सियाचीन जर भारताने गमावले तर  पश्चिमेकडून पाकिस्तान तर पूर्वेकडून चीन लडाखला काबीज करतील. 

🔸 सियाचीन हातातून गेले तर, लडाख हातातून जाईल. लडाख गेले तर कारगिल हातातून जाईल. कारगिल गेले तर NH1 हातातून जाईल. NH1 हातातून गेले तर जम्मू आणि काश्मीरचा भारतापासून संपर्क तुटेल. परिणामी लडाख सकट संपूर्ण जम्मू आणि काश्मीर भारताला गमवावा लागेल. 

🔸 तसेच उद्या जर भारताला POK आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर सियाचीन शिवाय ते शक्य नाही. 

🔸 जर काश्मीर वाचवायचे असेल आणि POK पुन्हा ताब्यात घ्यायचे असेल तर हा फक्त ७६ चौ किमी चा सियाचीन ग्लेशियरचा तुकडा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. म्हणून भारताला सियाचीन ट्राय-जंक्शन पासून एक इंचही हटणे परवडणारे नाही. 
 
२. कालापानी / लिपुलेख पास- 🇮🇳🇳🇵🇨🇳 

भारत-नेपाळ-चीन यांच्या सीमा या कालापानी ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात, जे सध्या बरेच चर्चेत आहे. कारण नेपाळने चीनच्या इशाऱ्यावर भारताच्या ताब्यात असलेल्या 'कालापानी, लिपुलेख आणि लिंफीयादुरा' या ३९७ चौ.किमीच्या 'ट्राय-जंक्शन' भूभागावर अवैध दावा केला आहे. 

कालापानी/लिपुलेख पासचे सामरिक महत्व- 

🔸 भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे कालापानी/लिपुलेख पास हे अन्य चारही ट्राय-जंक्शन्स पैकी सर्वांत जास्त महत्वाचे आणि संवेदनशील आहे.

🔸 लिपुलेख ट्राय-जंक्शन १७,००० फूट उंचीवर आहे. हा पास उत्तराखंडला तिबेटशी जोडतो. लिपुलेख पास ही एक 'फॉरवर्ड कमांडींग पोस्ट' आहे. इथून भारत चीनच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेऊ शकतो. 

🔸 भारताने थेट लिपुलेख पर्यंत कैलास-मानसरोवर तीर्थयात्रींकरीता ऑल-वेदर मजबूत रस्ता बांधला आहे. तसेच भारतीय सैन्याला सुद्धा थेट चीनच्या सीमेपर्यंत अत्यंत कमी वेळात धडक मारता येणार आहे.  

🔸भारताने जर या भागात अपाचे आणि चिनुक सारखे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स तैनात केले तर त्यांना इयरबेस किंवा धावपट्टीची सुद्धा गरज पडणार नाही. चिनुक हेलिकॉप्टर तर M777 होवीतझर तोफा सुद्धा वाहून नेऊ शकते. याद्वारे चीनच्या कोणत्याही दुःसाहसाला भारत चोख प्रत्युत्तर देऊ शकतो. 

🔸कालापानी/लिपुलेख पास जर भारताच्या हातून गेला, तर एक फार भयावह परिस्थिती भारतावर ओढवू शकते. कारण लिपुलेखचा एन्ट्री पॉईंट ते राजधानी दिल्ली हे अंतर फक्त ४१६ किमी इतके आहे. लिपुलेख जर चीनच्या ताब्यात गेले तर राजधानी दिल्ली चीनच्या बॉम्बवर्षक विमानांच्या रेंजमध्ये येणार. तसेच चिनी सैन्य २४ ते ४८ तासात राजधानी पर्यंत मुसंडी मारू शकते.

🔸 अन्य ट्राय-जंक्शन जर चीनच्या ताब्यात गेले तर कदाचित केवळ काश्मीर किंवा नॉर्थईस्ट भारतच चीनच्या ताब्यात जाऊ शकतो, परंतु जर लिपुलेख चीनने घशात घातला तर देशाची राजधानीच धोक्यात येऊ शकते. असा थेट राजधानीला धोका पाहता भारत लिपुलेख ट्राय-जंक्शन क्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी आता वेगाने लष्करी इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहे.

३. डोकलाम- 🇮🇳🇧🇹🇨🇳

भारत-भूतान-चीन यांच्या सीमा 'डोकालाम' या ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. डोकलाम हे तसे आहे भूतान मध्ये, परंतु भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्याने डोकलामवर भारताचे नियंत्रण आहे. 

डोकलाम चे सामरिक महत्व- 

🔸 तिबेटच्या 'चुंबी-व्हॅली' पासून भारताचा 'सिलिगुरी कॉरिडॉर अत्यंत जवळ आहे. हा कॉरिडॉर फक्त २२ किमी रुंद आहे, जो संपूर्ण नॉर्थ-ईस्ट भारताला शेष भारताशी जोडतो. याला भारताची 'चिकन-नेक' सुद्धा म्हणतात. 

🔸 बस्स, चीनचा ग्रँड प्लॅन हा आहे की, तिबेटच्या 'चुंबी व्हॅली' मधून सैन्य घुसवून थेट डोका-ला ट्राय-जंक्शन ताब्यात घेणे. तिथून चाल करीत सिलिगुरी कॉरिडॉरवर कब्जा करून आठ राज्यांसकट एकूण २.६ लाख चौ. कि.मी. चा संपूर्ण नॉर्थ ईस्ट भारत शेष भारतापासून तोडून टाकणे. 

🔸 परंतु जो पर्यंत 'डोकलाम पठार' भारताच्या ताब्यात आहे, चीनचा हा मनसुबा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण डोकलाम १५,००० फूट उंचीवर असल्याने भारत कमांडींग पोझिशनवर आहे. इथून भारत 'चुंबी व्हॅली'त चिनी हालचालींवर लक्ष ठेऊ शकतो. 

🔸 डोकलाम जर हातातुन गेले तर नॉर्थ ईस्टची आठही राज्ये चीनी ड्रॅगनच्या घशात जाऊ शकतात. म्हणून भारत डोकलाम कदापि सोडू शकत नाही. 

४. दिफु पास- 🇮🇳🇲🇲🇨🇳

भारत-म्यानमार-चीन यांच्या सीमा दिफु पास येथे येऊन मिळतात. मॅकमोहन लाईनच्या एंड पॉईंटवर अरुणाचल प्रदेशात दिफु पास आहे. दिफु पास हा म्यानमार मधून ईशान्य भारतात प्रवेश करण्यासाठी एक 'एन्ट्री-पॉईन्ट' आहे. 

दिफु पासचे सामरिक महत्व- 

🔸 चीन अरुणाचल प्रदेशला 'साऊथ तिबेट' म्हणतो आणि त्यावर नेहमी आपला अवैध दावा ठोकतो. पण अरुणाचल प्रदेशची तिबेट लगत सीमा ही अत्यंत दुर्गम आणि उंच हिमशिखरांनी व्यापलेली आहे. हाच दुर्गम अरुणाचल प्रदेश बाकीच्या मैदानी नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी एका संरक्षक तटबंदीचे काम करतो. 

🔸 चीनसाठी अरुणाचल मधून लष्करी आक्रमण करणे अतिशय प्रतिकूल आहे. म्हणून भारतात प्रवेश करण्यासाठी अरुणाचलचा दुर्गम प्रदेश बायपास करणे ही चीनची रणनीती आहे. 

🔸 दिफु पास ताब्यात घेऊन दुर्गम अरुणाचलला वळसा घालून आसामच्या मैदानी भागात सैन्य घुसवणे चीनसाठी सोपे आहे. त्यानंतर मेन लँड भारताशी नॉर्थ ईस्टचा संपर्क तोडून एक-एक राज्य गिळंकृत करणे हा चीनचा मनसुबा आहे. 

🔸दिपू पास जर हातातून गेला तर संपूर्ण नॉर्थईस्ट भारत चीनच्या घशात जायची भीती आहे. म्हणून भारत दिफु पास वर आपली पकड अधिकाधिक मजबूत करीत आहे. 

🐉 धूर्त चिनी ड्रॅगनची योजनाबद्ध आक्रमकता- 

मागील पाच वर्षांचा मागोवा घेत जर निरीक्षण केले, तर चीनच्या आक्रमकते मागे एक खास योजनाबद्ध पॅटर्न दिसून येतो. 

जिथे जिथे ही चार महत्वाची ट्राय-जंक्शन्स आहेत, नेमकी तिथेच हा धूर्त चीन भारतात आपले सैन्य घुसवायचा प्रयत्न करतो. ही चारही ट्राय-जंक्शन्स चीनला काहीही करून घशात घालायची आहेत. कारण चीनला माहीत आहे की त्याशिवाय हिमालयीन युद्धक्षेत्रात डॉमीनन्स मिळविणे अशक्य आहे. 

नेमक्या याच चार ट्राय-जंक्शन्सवर चीन वारंवार घुसखोरी करून भारताविरुद्ध मनोवैज्ञानिक दबावतंत्राचा वापर करीत असतो. दुसऱ्या शब्दात चीन भारताची लष्करी तयारी आणि मनोबलाची एक चाचणी घेत असतो.

२०१७ साली चीनने 'डोकलाम' मध्ये लष्करी तणाव निर्माण केला. पण भारताने एक इंचही जागा सोडली नाही. शेवटी चिनी सैन्याला निमूटपणे माघार घ्यावी लागली. 

२०२० ला चीनने भारताच्या लिपुलेख आणि लदाख या अन्य दोन ट्राय-जंक्शन लगतच्या क्षेत्रात एकाच वेळी आघाड्या उघडल्या आहेत. पण भारताने दबाव टाकून आधी नेपाळला सरळ केले, तर लदाख मध्ये बोफोर्स वगैरे जबरदस्त लष्करी सामुग्री तैनात करून चीनला मागे हटण्याचा सज्जड दम दिला आहे. इथेही चीनच्या हाती धुपाटणेच लागणार आहे. 

हाच पॅटर्न पाहता येत्या काळात चीन डोकलाम, लिपुलेख, लदाख नंतर दिफु पास येथे सुद्धा आक्रमकता दाखवू शकतो. 

चीनच्या अस्वस्थतेचे प्रमुख कारण म्हणजे चीन सीमेलगत तसेच या चार ट्राय-जंक्शन क्षेत्रात भारत वेगाने मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. भारताने ७५% टक्के मजबूत रस्ते आधीच तयार केले आहेत. सध्या लडाख तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ११ स्पेशल ट्रेन्स चालवून १२,००० मजुरांना उर्वरित इन्फ्रास्ट्रक्चर तातडीने पूर्ण करण्यासाठी चीन सीमेवर पाठवले आहे. तसेच आसाममध्ये बोगीबिल ब्रिज, LAC जवळ चंबा टनेल तयार केलेला आहे. याव्यतिरिक्त वायुसेनेसाठी पक्के एयरबेसेस, टेम्पररी लँडिंग स्ट्रिप्स, हेलिपॅड्स यांचे निर्माण युद्धस्तरावर केले जात आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून विशेषतः नरेंद्र मोदी यांचे मजबूत नेतृत्व मिळाल्यापासून भारताची एक 'सॉफ्ट स्टेट' अशी इमेज आता राहिलेली नाही. भारत एक जबाबदार देश तसेच एक लष्करी शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच तेजस सारख्या अनेक हत्यारांची देशांतर्गत निर्मिती तसेच विदेशातून राफेल, S-400 सारख्या अत्याधुनिक आयुधांचा समावेश यांमुळे भारतीय सैन्याचे आणि जनमानसाचे मनोबल वाढत आहे. याव्यतिरिक्त भारत सरकार कुटनीतिक पातळीवर तर भारतीय सैन्य ग्राउंड झिरोवर दरवेळी चीनच्या आक्रमकतेची हवा काढत आहेत. 

चीनला आता कळायला हवे की, हा १९६२ चा भारत नाही. ये आज का नया भारत है..!!

Comments

Popular posts from this blog

आधुनिक अभिनव तंत्रगुरु राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव

आधुनिक अभिनव तंत्रगुरु श्री राजीवभाऊ जगताप  सर  :-  एक अनुभव  लेखक:- प्रा डॉ योगेश मलशेट्टे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सर यांच्या अथक प्रयत्नांनी १९९८ मध्ये संस्थेची स्थापना केली तसेच 2007 मध्ये वडवाडी या ठिकाणी तंत्र संकुलनाची सुरुवात केली. आज सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आणि डिग्री हे याचाच एक भाग आहे या इंजीनियरिंग कॉलेजच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव भाऊ जगताप यांनी वडवाडी, भोर पासून जवळच, भाटघर धरणाच्या अगदी समोर चाळीस एकर च्या विशाल वडवाडी पठारा वरील कॅम्पसमध्ये तंत्रशिक्षणाची ची सुरुवात केली आणि आज इथे सर्व सुविधायुक्त तंत्रशिक्षणाचे संकुल अतिशय जोमात तंत्रशिक्षण देण्याचं काम करत आहे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की या तंत्रनिकेतनात साधारणता 22 जिल्ह्यातील  122 पेक्षा जास्त तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागातील ग्रामीण भागातील व...

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

China disputes with 18 countries

China's Border Disputes Dr. Yogesh Malshette PUNE RESEARCH TIMES China has border disputes with 18 countries that surround China from all sides. From India to Japan to The Philippines, China has on several occasions been subject of criticism by the international community over its 'expansionist policies'. China's Border Disputes 1)  India   China occupies 38,000 sq km Indian territory that goes by the name Aksai Chin. It also stakes claim on Arunachal Pradesh and Ladakh. It was this expansionist policy that led to the recent clashes between the PLA and the Indian Army. 2)  Vietnam   China claims large parts of Vietnam on historical precedent (Ming Dynasty, 1368-1644). Also, Macclesfield Bank, Paracel Islands, parts of the South China Sea and the Spratly Islands.  3)  Japan  Parts of South China Sea particularly Senkaku Islands, Ryukyu Islands are claimed by Japan and both countries are at loggerheads with this boundary issue 4) Nepal   China ...